Wednesday, October 13, 2010

प्रिय मैत्रिणीस...


किती दिवस झाले हे नक्की सांगता येणार नाही... पण आपण दोघीच बसून ,चहाचे घोट घेत निवांत गप्पा मारतोय, असा प्रसंग बरेच दिवसात झाला नाही ग. का ग असं झाल?
एकमेकींना भेटणं, विचारपूस करण, एकमेकींबरोबर खरेदीला जाण, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं, फोनवर बोलत रहाण, एकमेकींना प्रोत्साहन देत रहाण.... हे सगळ अगदीच कमी होऊन गेलय.. हो ना सखे!

तू कधीही हाक मारलीस तरी धावत होते तुझ्यासाठी. तू नसतानाही तुझ्या घरी काही मदत लागली तर करत होते. तुझं कोणतही काम असेल आणि तुझ्याबरोबर जायच असेल तर तुला नाही म्हणण मला कधी जमलच नाही. मैत्रीच नातच अस असत गं... पण हळूहळू काळाबरोबर हे बंध सैलावत गेले. कोणतही नात असू देत, ते दोन्ही बाजूंनी समजूतीने आणि प्रेमाने जपलं गेल तर ते तग धरुन रहात आणि फुलून येत. पण तस नाही झाल ना तर त्याच ओझ होत आणि ते त्या दोन व्यक्तिंपैकी कोणा एकासाठी जड बनून रहात.
खूप निखळपणे ही मैत्री जपण्याचा प्रयत्न केला मी. पण हळूहळू काही गोष्टी अशा उलगडत गेल्या की मीसुद्धा या नात्यातून अंग काढून घेतलं. तुझ्या मनात माझ्या बद्दल काय असूया होती कोणास ठाऊक?पण प्रत्येक वेळी तू माझ्यापेक्षा हुशार/व्यवहारचतुर आहेस हे जाणवून घेऊन स्वतःच समाधान करुन घ्यायचीस. तुझ हे वागण मला बरयाचदा जाणवल. पण त्याच मला काहीच वावग नव्हत गं. पण आपल्या शाळेतल्या बाईंसमोरही तू तोच विषय नेहमी उगाळत बसायचीस, ज्यातून तु हेच अभिप्रेत करायचीस की 'शालेय शिक्षणात जरी तू माझ्यापेक्षा हुशार होतीस तरी आता शिक्षण पूर्ण करुन नोकरीला गल्यावर मी तुझ्यापेक्षा कुठेच कमी नाही!'असू दे ना गं, चांगली गोष्ट आहे. पण हे बोलून दाखवल्याने तुला मोठेपणा प्राप्त झाल्यासारख वाटल का!

तू कधीही हाक मारावीस आणि मी काही विचार न करता घरातून निघाव, भले मला त्यासाठी आई-बाबांचा ओरडा खावा लागला तरी चालेल, त्याची पर्वा नाही केली मी! पण मला जेव्हा गरज पडली तेव्हा मात्र तू वेळ असूनही कारणं देऊन यायच टाळलस. खूप वाईट वाटल गं मला. या गोष्टी जाणवूनही मी कानाडोळा करत राहिले. पण जसजशी जाणिव तीव्र होत गेली तसा मैत्रीचा एकएक धागा तुटत राहिला. आता मीहि वागण्यात थोडी औपचारिकता ठेवून असते. अर्थातच त्याबद्दलचे टोमणे ऐकावे लागतातच मला तुझ्याकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून! पण ते ठीक आहे. हे ऐकून सोडूनही देता येत. पण आपल्या माणसांकडून मनाला झालेल्या जखमां लवकर भरुन निघत नाहीत. काही नात्यासाठी एक लक्ष्मणरेषा आखलेलीच बर असतं. त्या रेषेपलीकडे आपण जायच नाही आणि तिच्या आत समोरच्याला प्रवेश द्यायचा नाही. दोन्ही बाजूची मने अलवार रहातात.. भावनांचा गुंता नाही होत. आणि अशा नात्याची जपणूक करण्याच ओझ नाही वाटत.