Wednesday, October 13, 2010

प्रिय मैत्रिणीस...


किती दिवस झाले हे नक्की सांगता येणार नाही... पण आपण दोघीच बसून ,चहाचे घोट घेत निवांत गप्पा मारतोय, असा प्रसंग बरेच दिवसात झाला नाही ग. का ग असं झाल?
एकमेकींना भेटणं, विचारपूस करण, एकमेकींबरोबर खरेदीला जाण, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं, फोनवर बोलत रहाण, एकमेकींना प्रोत्साहन देत रहाण.... हे सगळ अगदीच कमी होऊन गेलय.. हो ना सखे!

तू कधीही हाक मारलीस तरी धावत होते तुझ्यासाठी. तू नसतानाही तुझ्या घरी काही मदत लागली तर करत होते. तुझं कोणतही काम असेल आणि तुझ्याबरोबर जायच असेल तर तुला नाही म्हणण मला कधी जमलच नाही. मैत्रीच नातच अस असत गं... पण हळूहळू काळाबरोबर हे बंध सैलावत गेले. कोणतही नात असू देत, ते दोन्ही बाजूंनी समजूतीने आणि प्रेमाने जपलं गेल तर ते तग धरुन रहात आणि फुलून येत. पण तस नाही झाल ना तर त्याच ओझ होत आणि ते त्या दोन व्यक्तिंपैकी कोणा एकासाठी जड बनून रहात.
खूप निखळपणे ही मैत्री जपण्याचा प्रयत्न केला मी. पण हळूहळू काही गोष्टी अशा उलगडत गेल्या की मीसुद्धा या नात्यातून अंग काढून घेतलं. तुझ्या मनात माझ्या बद्दल काय असूया होती कोणास ठाऊक?पण प्रत्येक वेळी तू माझ्यापेक्षा हुशार/व्यवहारचतुर आहेस हे जाणवून घेऊन स्वतःच समाधान करुन घ्यायचीस. तुझ हे वागण मला बरयाचदा जाणवल. पण त्याच मला काहीच वावग नव्हत गं. पण आपल्या शाळेतल्या बाईंसमोरही तू तोच विषय नेहमी उगाळत बसायचीस, ज्यातून तु हेच अभिप्रेत करायचीस की 'शालेय शिक्षणात जरी तू माझ्यापेक्षा हुशार होतीस तरी आता शिक्षण पूर्ण करुन नोकरीला गल्यावर मी तुझ्यापेक्षा कुठेच कमी नाही!'असू दे ना गं, चांगली गोष्ट आहे. पण हे बोलून दाखवल्याने तुला मोठेपणा प्राप्त झाल्यासारख वाटल का!

तू कधीही हाक मारावीस आणि मी काही विचार न करता घरातून निघाव, भले मला त्यासाठी आई-बाबांचा ओरडा खावा लागला तरी चालेल, त्याची पर्वा नाही केली मी! पण मला जेव्हा गरज पडली तेव्हा मात्र तू वेळ असूनही कारणं देऊन यायच टाळलस. खूप वाईट वाटल गं मला. या गोष्टी जाणवूनही मी कानाडोळा करत राहिले. पण जसजशी जाणिव तीव्र होत गेली तसा मैत्रीचा एकएक धागा तुटत राहिला. आता मीहि वागण्यात थोडी औपचारिकता ठेवून असते. अर्थातच त्याबद्दलचे टोमणे ऐकावे लागतातच मला तुझ्याकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून! पण ते ठीक आहे. हे ऐकून सोडूनही देता येत. पण आपल्या माणसांकडून मनाला झालेल्या जखमां लवकर भरुन निघत नाहीत. काही नात्यासाठी एक लक्ष्मणरेषा आखलेलीच बर असतं. त्या रेषेपलीकडे आपण जायच नाही आणि तिच्या आत समोरच्याला प्रवेश द्यायचा नाही. दोन्ही बाजूची मने अलवार रहातात.. भावनांचा गुंता नाही होत. आणि अशा नात्याची जपणूक करण्याच ओझ नाही वाटत.

Thursday, May 20, 2010

सखा

तिच्या मनातली अबोली : खरच कसा आहे माझा सखा? त्याचं बोलण,चालणं, लहान-सहान गोष्टींसाठी माझ मत विचारणं, समजावण, समजावून घेण.. त्याची प्रत्येक हालचाल,व्यवहार मी टिपत रहाते. लग्नाआधी अनोळखी असे आम्ही आता एकमेकाना समजू लागलोय. आवडतोय त्याचा सहवास मला!!
पण मग अस का होत कधीकधी.. लग्नाआधीचं स्वच्छंदी आयुष्य आठवतं.. बेफिकीर.. म्हटल तर थोड बेजबाबदारही! शाळा,कॉलेज,नंतर जॉब, मित्रमैत्रीणी, भटकंती, सिनेमे, खादडणे...बस्स्स हेच विश्व!!!
थोडी चिडचिड होते माझी. रोज घरातला पसारा आवरा,स्वयंपाक-पाणी करा, कपडे-भांडी आवरा..मीच का हे सारख करत रहाव... किती कामं पडलीयेत आजची. फर्निचरच्या कामाच पसारा पडलाय, टाईल्सचे काम सुरु आहे तो पसारा आवरायचाय, स्वयंपाक व्हायचाय अजून...
७.३० ची वेळ. दारावरची बेल वाजते. ती दार उघडते. दारात सखा.
तो : हाय!!
उत्तरादाखल तिच एक स्मितहास्य!
मनातल्या अबोलीला शांत करत ती स्वयंपाकाच्या तयारीला लागते.

तो शांतपणे आत येतो. फ्रेश होतो. धुण्याचे कपडे मशिनला लावून देतो. घर झाडून घेतो.
टाईल्सवर पाण्याचा एक हात मारतो.

इकडे स्वयंपाकघरात - भात,भाजी,वरण झालय, कणिक मळलीये आता पोळ्या लाटण्याची तयारी सुरु आहे. इतक्यात फोन वाजतो. सासूबाईंचा फोन. फोनवर बोलण्यासाठी ती निघून जाते. अर्धातास बोलून झाल्यावर, फोन ठेवून आत येते, बघते तर.. शेवटची पोळी तव्यावर भाजली जातेय. पोळी भाजून तो उठतो.

तो : अरेच्चा! कपडे वाळत घालायचेत, झाले असतील. मी जातो. तू हा थोडा पसारा आवरुन घे. आज ऑफीस-मीटिंग्जमधे भरपूर मारामारी झालीये. डोकं भणभणतयं. छानपैकी जेवण करू आणि शांतपणे झोपू.

ती स्तब्धपणे बघत राहिलेली...
तिच्या मनातली अबोली : किती निरपेक्षपणे काम करतो माझा सखा! आणि मी इतकी व्यवहारी का होते? माझी मलाच लाज वाटतेय.
ती डोळे भरुन त्याच्याकडे पहाते आणि त्याला घट्ट अलिंगन देते.
तिच्या मनातली अबोली साश्रू नयनांनी फुलत रहाते.